पुणे : ‘सध्या आपण सगळे मिळून न जगता एकट्यापुरते जगत आहोत,पण पैशाच्या दुनियेत न जगता माणुसकीवर आधारित जीवन जगलं पाहिजे’, असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केले. बोन मॅरो प्रत्यारोपण व बोन मॅरो डोनेशन याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या प्रयत्नाअंतर्गत रूबी हॉल क्लिनिक येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमात शंभरहून अधिक बोनमॅरो प्रत्यारोपण केलेल्या रूग्णांनी आपले अनुभव सांगितले. या वेळी वैद्यकीय संचालक डॉ. संजय पठारे, हेमॅटोलॉजिस्ट व बोन मॅरो ट्रान्सप्लांट विभागाचे प्रमुख डॉ. विजय रमणन, बोन मॅरो ट्रान्सप्लांट विभागाचे वैद्यकीय समन्वयक डॉ. भूषण शिंदे, ‘थॅलेसेमिया सोसायटी ऑफ महाराष्ट्र’चे सचिव समीर निकम, रूबी हॉल क्लिनिकमधील लॅबोरेटरीच्या संचालिका डॉ. नीता मुन्शी, रक्तपेढीच्या प्रमुख डॉ. स्नेहल मुजुमदार, बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिटच्या समन्वयक तृप्ती ठाणेकर आणि रूबी हॉल क्लिनिकचे अधिकारी अलंकार आदी उपस्थित होते. त्यांनतर झालेल्या चर्चासत्रात डॉ. विजय रमणन, डॉ. भूषण शिंदे, नीता मुन्शी, डॉ. स्नेहल मुजुमदार, बीएमटी विभागाच्या इन्चार्ज नर्स मीना पीटर, डॉ. रिबेका यांनी भाग घेतला. थॅलेसेमिया रूग्णांच्या उपचारात रक्तपेढी, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या, लॅबोरेटरी व परिचारिका या महत्त्वाच्या भूमिका बजावतात,असे मत या चर्चासत्रात व्यक्त झाले.
अनिल अवचट म्हणाले, ‘बोन मॅरो प्रत्यारोपण केलेल्या रूग्णांना विज्ञानामुळे नवे जीवन मिळाले आहे. या नवोन्मेषाचे चांगले दृश्य दिसत आहे. ही एक नवीन संधी मिळाली असून, आपले जीवन चांगल्या पध्दतीने जगावे, तर तुम्हाला नवजीवन देणाऱ्या विज्ञानाचे सार्थक होईल.’
‘बोन मॅरो प्रत्यारोपण झालेल्या रूग्णांनी स्वगट स्थापन करावा’, असा सल्ला देऊन, ते म्हणाले, ‘नुसता पैसा मिळाला की वस्तू घ्या, असे न करता माणुसकीच्या आधारे जीवन जगणे गरजेचे आहे. स्वत:चे दुख मोठे आहे असे न समजता इतरांच्या दु:खाकडेदेखील लक्ष दिले पाहिजे. त्यांनी मदत मागण्याआधी आपण ते ओळखून मदतीचा हात पुढे केला पाहिजे.एखाद्या कळपाप्रमाणे सर्वांनी हातात हात धरून पुढे जाणे आवश्यक आहे.’
डॉ. संजय पठारे यांनी प्रास्ताविक केले.